बुधवार, १८ जून, २०१४

पाऊस पडत असेल बघ !

पाऊस पडत असेल बघ
तुझ्या आठवांच्या गावी ।
मनात अशी रेशीमओळ
उगीच मला सुचेल का!!

तुझी चाल लाऊन सखे
गाणे होते कवितांचे ।
लय अशी वेड्या वेळी
हृदय उगीच धरेल का!!

जाग येतेच समेवर
झोप देखील मंत्रमुग्ध ।
तुझ्या चांदणचाहूलीची
वेळ कधी चुकेल का!!

नाही म्हणून पाऊस देखील
ऐकत नाही कुणाचं ।
मुसळधार कोसळताना
मन कोरडे ठेवेल का!!

जरा धरेला ओलेत्याने
भिजवून जाता नभ आवेगा ।
इंद्रधनूची पखरण होता
सुख कोरडे राहिल का!!

लिहितो नाही शिंपण होते
तुझ्या किती गं आठवणींची ।
सरता शाई शब्दो शब्दी
कविता होणे राहिल का!!

- रोहित ऊर्फ दुष्यंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अभिप्राय नोंदवा :