मनाशीच संवाद साधायचे ! मनाचे उसासे गिरवायचे !! अर्थांत शब्दांस फिरवायचे ! निखारे मनाचे शमवायचे !! क्षणाने क्षणाला भुलवायचे ! निमिषात आकन्ठ भिजवायचे !! अश्रूंसवे हास्य सजवायचे ! प्रश्नास विश्रांत निजवायचे !! नव्या स्वप्न-जगतास प्रसावायचे ! सुखी शांत आत्म्यास वसवायचे !! - दुष्यंत उर्फ रोहित
Monday, February 28, 2011
सांग...
सांज कशाने होते गहिरी
रात्र अशी का छळते वैरी ?
रम्य दिसाची स्वप्नें जागत
पहाट येते, सरत्या प्रहरी !!
लखलखणारे, दूर चांदणे
आसुसलेली अंत:करणे
माझ्यासाठी चमचमणारे
सांग कशाने, येतील जवळी ?
सांग कशाने, साठवलेली
स्वप्ने सारी अवतरतील का ?
तीच ठेच पण, पुन्हा नव्याने
अश्रू कोणी, आवरतील का ?
असे कधी गं आलो होतो
जाण्यासाठी दूर, नभांशी
सांग गवसणी, घालतील का
ते उडलेले अल्लड पक्षी ?
वाटेवरचे अडसर सारे,
पुन्हा एकदा झिडकारून, या
उरलेल्या जगण्याची गंमत
सांग तयांविण कशी यायची ??
-रोहित उर्फ दुष्यंत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
अभिप्राय नोंदवा :